
१४०० हत्यांचा आरोप; शेख हसीना म्हणतात, ‘मी निर्दोष, माझ्याविरुद्ध राजकीय षड्यंत्र’
बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना सध्या मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांपासून ते आंदोलनकर्त्यांच्या हत्यांपर्यंतच्या गंभीर आरोपांना सामोऱ्या जात आहेत.
देश सोडल्यानंतर चाललेल्या या खटल्याला त्यांनी राजकीय सूडातून रचलेलं ‘ढोंग’ म्हणत सर्व आरोप नाकारले आहेत. आता ढाक्यातील विशेष न्यायाधिकरणाच्या (ट्रिब्यूनल) निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
येत्या काही दिवसांत याप्रकरणी निर्णय देणाऱ्या विशेष न्यायाधिकरणाची सुनावणी पूर्ण होणार आहे.
हसीना यांच्यावर त्यांच्या कथित एकाधिकारशाहीविरोधात झालेल्या मोठ्या आंदोलनादरम्यान शेकडो लोकांच्या हत्या घडवून आणल्याचा प्रमुख आरोप आहे. परंतु, त्यांनी हा आरोप फेटाळला आहे.
‘हे तर कांगारू कोर्ट, खटल्याचं केवळ ढोंग’
गेल्या वर्षी ५ ऑगस्ट २०२४ रोजी देश सोडल्यानंतर बीबीसीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत हसीना म्हणाल्या होत्या की, त्यांच्यावर देशाबाहेर असताना चालवलेला खटला हे एक ‘ढोंग’ आहे.
विरोधकांच्या नियंत्रणाखालील असलेलं ‘खोटं न्यायालय’ (कांगारू कोर्ट) हा खटला चालवत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
येत्या सोमवारी (१७ नोव्हेंबर) या प्रकरणाची सुनावणी होणार असून हसीना दोषी ठरल्यास, त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे.
या खटल्याचा निकाल ‘आधीच ठरवलेला असून त्यांना दोषी ठरवणं’ हेच त्याचं उद्दिष्ट आहे, असा दावा हसीना यांनी केला.




