
जपान – कर्णबधिरांच्या गत ऑलिम्पिकमध्ये प्रांजली धुमाळने दहा मीटर एअर पिस्तुलच्या प्राथमिक टप्प्यात जागतिक विक्रम केला होता. मात्र, पदक निश्चित करणाऱ्या अंतिम फेरीत तिची पीछेहाट झाली होती. ब्राझीलमधील या अपयशाची पुरेपूर भरपाई प्रांजलीने सोमवारी टोकियोत सुरू असलेल्या कर्णबधिरांच्या ऑलिम्पिकमधील नेमबाजीतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात केली. या स्पर्धेत तिने सुवर्णपदकाचा वेध घेतला. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण १९ पदके जिंकली आहेत.
प्रांजलीस टोकियोत दहा मीटरमध्ये दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, त्या वेळी तिने २५ मीटरमध्ये यशस्वी होणार असल्याची ग्वाही दिली होती आणि तोच शब्द खरा ठरवला. तिने अंतिम टप्प्यात ३४ गुणांचा वेध घेताना युक्रेनच्या हाल्यना मोसिना हिला दोन गुणांनी मागे टाकले. अनुयाला २५ मीटर पिस्तूल प्रकारात बाजी मारलेली अनुया प्रसाद ब्राँझपदकापासून दूर राहिली. जिवॉन जेऑन हिने तिला पहिले तीन नेमबाज ठरवण्यासाठी झालेल्या शूटऑफमध्ये मगे टाकले होते. दरम्यान, प्रांजलीचे या स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक आहे. तिने अभिनव देशवालच्या साथीत दहा मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र सांघिकमध्ये बाजी मारली होती.
‘अंतिम टप्प्यात या वेळी चूक नको,’ हा निर्धार नको हे स्वतःला बजावून प्रांजलीने सुरुवात केली. तिने पहिल्या टप्प्यात पाचपैकी चारमध्ये गुण मिळवून आघाडी घेतली. ती नवव्या फैरीपर्यंत राखली होती. मात्र, त्याच सुमारास मोसिनाने तिला ३० गुणांवर गाठले. अखेरच्या दहाव्या फैरीत कमालीच्या दडपणाखाली प्रांजली चार गुण मिळवत असताना मोसिनाला दोनच गुण मिळवता आले. या यशामुळेच प्रांजलीचे सुवर्ण निश्चित झाले.
प्रांजलीने प्राथमिक फेरीत ५७३ गुणांचा वेध घेत स्वतःच केलेला ५७२ गुणांचा विक्रम मोडला. ही कामगिरी तिने गत वर्षीच्या जागतिक कर्णबधीर नेमबाजी स्पर्धेत केली होती. प्राथमिक फेरीत अनुया ५६९ गुणांसह दुसरी होती. भारतीय नेमबाजांनी या स्पर्धेत सात सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन ब्राँझसह १६ पदके जिंकली आहेत.




