संतोष बांगर यांच्या घरावर १०० पोलिसांची धाड, गुंडाच्या घरासारखी झाडाझडती घेतली; हेमंत पाटलांचा भाजप आमदारावर आरोप…

SHARE:

हिंगोली : राज्यात मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेतील हिंगोलीतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरी १०० पोलिसांनी पहाटे धाड टाकून झाडाझडती घेतल्याची माहिती विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली. भाजप आमदाराच्या दबावाखाली पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला. या प्रकरणाची दखल एकनाथ शिंदे यांनी घेतली असून आपण मुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याचं ते म्हणाले.

हिंगोली नगरपालिका निवडणुकीत शिंदेंचे आमदार संतोष बांगर आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आमनेसामने आले आहेत. भाजप आमदाराच्या दबावामुळेच संतोष बांगर यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला.

कुणाच्या सागंण्यावरुन धाड?

शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील म्हणाले की, “जिल्ह्यात शिवसेनेची स्थिती आता चांगली आहे. कळमनुरी आणि हिंगोली शहरावर सेनेचा भगवा फडकणार आहे. परंतु विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं दिसतंय. संतोष बांगर यांच्या घरावर पहाटे पाच वाजता १००  पोलिसांनी धाड टाकून झाडाझडती घेतली. संतोष बांगर यांची ७५   वर्षांची आई आजारी असताना त्यांच्या घराची झाडाझडती घेऊन त्रास देणे ही अतिशय वाईट गोष्ट आहे.

हेमंत पाटील पुढे म्हणाले की, “आमदार असल्याने त्यांच्या घराची झाडाझडती करताना त्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते. पण विधानसभा सभापतींकडून तसा कोणताही आदेश वा मेल आला नाही. मग ही धाड कुणाच्या सांगण्यावरुन टाकण्यात आली? सत्ताधारी आमदार मुटकुळेंच्या दबावाखाली ही कारवाई करण्यात आली आहे का?”

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

या प्रकरणाची गंभीर दखल एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तसेच आम्ही दोन्ही जिल्ह्यातील आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहोत. राज्यात आम्ही सत्तेतील समान वाटेकरी आहोत. असं असतानाही स्थानिक आमदार पोलिसांवर दबाब टाकत आहेत, ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहोत असं हेमंत पाटील म्हणाले.

एखाद्या आमदाराच्या घराची झाडाझडती ही दहशतवादी किंवा गुंडाच्या घराची झाडाझडती केल्यासारखी घेण्यात आली. निवडणुका या काही काळापुरत्या आहेत, लोक आपल्याकडे बघत असतात असं सांगत हेमंत पाटील यांनी महायुतीतील मित्रपक्षावर टीका केली.

बांगर जिल्ह्याला लागलेला कलंक, मुटकुळेंची टीका

संतोष बांगर हा हिंगोली जिल्ह्याला लागलेला कलंक असल्याचं म्हणत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी टीका केली. संतोष बांगर पैशांशिवाय राहू शकत नाही. त्यांचे अनेक अवैध धंदे असल्याचा आरोप तानाजी मुटकुळे यांनी केला. संतोष बांगर यांनी सत्तांतराच्या काळात ५०  खोके घेतले ही सत्य गोष्ट असल्याचा दावा भाजप आमदार तानाजी मुटकुळेंनी केला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा