निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीचे; सी. एम. फडणवीसांची राज्य निवडणूक आयोगावर नाराजी, काय म्हणाले?

SHARE:

छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. निवडणुका रद्द करणे हे अत्यंत चुकीचे आहे. कोणीही न्यायालयात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलण्यात येईल, असे आजपर्यंत कधीच झाले नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, निवडणुका रद्द करण्यामागे सत्ताधाऱ्यांचा हात आहे, असा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी रात्री माध्यमांशी बोलताना केला.

मुख्यमंत्री फडणवीस प्रचारसभेसाठी सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. काही नगरपालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारणा केली. त्याबाबत ते म्हणाले, ‘निवडणूक आयोग कोणता कायदा काढत आहे, कुणाचा सल्ला घेत आहे, याची मला कल्पना नाही. जेवढा मी कायदा बघितला, माझा जितका अभ्यास आहे किंवा वकिलांशी मीही बोललो आहे, त्या सर्वांच्या मतांनुसार कुणीही न्यायालयात गेले, तर निवडणुका रद्द होत नाहीत.’

निवडणुकीसाठी ज्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली. त्यांची मेहनत, कष्ट मतदानाच्या एक दिवस अगोदर वाया गेले. पुढील १५ दिवस संबंधितांना पुन्हा सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. हा त्या उमेदवारांवर अन्याय असून, हे अतिशय चुकीचे आहे. या निवडणुकीनंतर आम्ही निवडणूक आयोगाला निवेदन देऊ, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

दरम्यान, नगरपालिकेच्या काही ठिकाणच्या निवडणुका स्थगित झाल्याबाबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. निवडणुका रद्द करण्यामागे सत्ताधाऱ्यांचा हात असावा, असा आरोप दानवे यांनी केला.

फडणवीस-शिंदे भेट नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरातील एकाच हॉटेलात मुक्कामी होते. मात्र, त्यांची साधी भेटही न झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘मी रात्री उशिरा आलो आणि त्यांच्यापेक्षा लवकर निघालो आहे. आम्ही दोघेही प्रचारात मग्न आहोत, फोनवर आमचे रोज बोलणे होते. मी लवकर जात असल्यामुळे भेट झाली नाही एवढेच.’

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र पाठवून जुन्याच वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याची मागणी केली. तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग स्वत:चे नियम पाळण्यात अपयशी ठरल्याची टीका केली.

निवडणूक पुढे ढकलणे नियमाला धरूनच

मुंबई : न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे राज्यातील २० नगर परिषदा आणि चार नगर पंचायतींच्या निवडणूका पूर्णपणे स्थगित करून, ७६ नगर पंचायती आणि परिषदांमधील १५४ सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. संबंधित प्रभागातील सदस्य अपिलात गेल्याने हा पेच निर्माण झाला असून निवडणूक पुढे ढकलणे हे पूर्णपणे नियमाला धरून असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी स्पष्ट केले. तसेच, मतमोजणी उद्या, बुधवारीच होणार असल्याचेही आयोगाने सांगितले.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, निवडणूक आयोग स्वायत्त असून त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे त्यांनी निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय मान्य करावा लागेल.

Leave a Comment