
नाशिक : राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत. या निवडणुकीत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपनं सर्वाधिक नगर परिषदा जिंकल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना दुसर्या आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या स्थानी आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आश्चर्यकारक निकालाची नोंद केली आहे. भगूर नगर पंचायतीत राष्ट्रवादीनं सत्ता खेचून आणली आहे. इथे शिंदेसेनेचा पराभव झाला आहे.
नाशिकमधील भगूर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं गाव म्हणून परिचित आहे. स्वातंत्र्यवीरांचं गाव हीच भगूरची ओळख आहे. भगूरमध्ये करंजकर विरुद्ध बलकवडे असा जुना संघर्ष आहे. मागील २७ वर्षांपासून या गावात विजय करंजकर आणि शिवसेनेची सत्ता होती. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानं करंजकर नाराज झाले आणि त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेसोबतच इथली राष्ट्रवादी काँग्रेसही दोन गटात विभागली गेली. प्रेरणा बलकवडे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली. भगूर गाव देवळाली विधानसभा मतदारसंघात येतं. मतदारसंघ राखीव असल्यानं प्रेरणा बलवकडे यांना इच्छा असूनही विधानसभेची निवडणूक लढवता आली नाही. त्यामुळे बलकवडे यांनी नगर पंचायतीच्या निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावली.
करंजकर विरुद्ध बलकवडे या संघर्षात बलकवडे यांनी बाजी मारली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बलकवडे यांना ५ हजार ४०७ मतं मिळाली. तर अनिता करंजकर यांना ३ हजार ४९४ मतं मिळाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आधीपासूनच आघाडी कायम ठेवली. मतमोजणीत घेतलेली आघाडी बलकवडे यांनी अखेरपर्यंत टिकवली. बलकवडे यांना भाजपचा पाठिंबा होता. भगूर नगरपरिषदेत मागील २७ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. तेव्हा शिवसेना एकसंध होती. मात्र आता शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला भगूरवासीयांनी नाकारलं.
भगूरमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना (उबाठा) अशी लक्षवेधी लढत झाली. करंजकर यांना सत्तेपासून दूर राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना उबाठा यांची युती घडवली. अखेर या प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादीचा विजय झाला.




