
नवी दिल्ली: भारत २०३० च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करणार आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा सर्वसाधारण सभेत अहमदाबाद शहराच्या नावावर औपचारिक शिक्कामोर्तब झाले. भारताला २० वर्षांनंतर कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. भारताने यापूर्वी २०१० मध्ये दिल्ली येथे कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन केले होते. यावेळी हे आयोजन अहमदाबादमध्ये होणार आहे, जिथे गेल्या दशकात क्रीडा पायाभूत सुविधांचा वेगाने विकास करण्यात आला आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत ब्रिटिशांच्या वसाहती असलेल्या ७२ देशांचे खेळाडू भाग घेतात. २०३० च्या आयोजनासाठी भारताचा सामना नायजेरियातील अबुजा शहराशी होता. मात्र, कॉमनवेल्थ स्पोर्टने नायजेरियाला २०३४ च्या स्पर्धेसाठी विचारात घेण्याचा निर्णय घेतला.
२०३० मध्ये कोणत्या खेळांचा पुन्हा समावेश?
२०२६ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतून भारताचे वर्चस्व असेलेले अनेक खेळ वगळण्यात आले आहेत. २०२६ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेचे बजेट मर्यादित ठेवण्यात आले आहे आणि त्यात केवळ १० खेळांचा समावेश आहे. यामध्ये कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन आणि हॉकी यांसारख्या खेळांना वगळण्यात आले आहे, ज्याला भारताने तीव्र विरोध केला होता. मात्र, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) स्पष्ट केले आहे की भारत २०३० च्या स्पर्धेत पुन्हा त्या सर्व खेळांचा समावेश करेल. IOA चे संयुक्त सचिव कल्याण चौबे यांनी सांगितले होते की नेमबाजी, कुस्ती, तिरंदाजी यांसारख्या खेळांसोबतच कबड्डी आणि खो-खो यांसारख्या पारंपरिक खेळांनाही जोडण्याची योजना आहे.
अहमदाबादमध्ये जोरदार तयारी सुरू
अहमदाबादमध्ये तयारीला वेग आला आहे. गेल्या काही महिन्यांत अहमदाबादने राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप, एशियन एक्वाटिक्स चॅम्पियनशिप आणि एएफसी यू-१७ एशियन कप क्वालिफायर्स यांसारख्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. आगामी काळात येथे एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप, आशिया पॅरा-आर्चरी कप आणि २०२९ वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्सचेही आयोजन केले जाईल. सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हमध्ये एक मोठा क्रिडा परिसर विकसित केला जात आहे. यामध्ये जगातील सर्वात मोठे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, एक्वाटिक्स सेंटर, फुटबॉल स्टेडियम आणि इनडोअर एरिनाज तयार होतील. ३,००० खेळाडूंसाठी ॲथलीट व्हिलेज देखील याच परिसरात बांधले जाईल.





