साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील २२० कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त

SHARE:

नाशिक : नाशिकच्या तपोवनातील साधुग्रामच्या जागेवरील वृक्ष तोडीचा वाद चिघळलेला असतानाच महापालिका प्रशासन नव्या वादात सापडले आहे. ज्या ठिकाणी साधुग्राम उभारायचे आहे त्या ठिकाणी PPP अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनर्शीप तत्ववार प्रदर्शन केंद्र, बॅक्वेंट हॉल, रेस्ट्रोरंट उभारण्याच्या घाट घातला जात आहे. या संदर्भात २२०  कोटी रुपयांचे टेंडर महापालिका प्रशासनाने काढले असून ३३ वर्षासाठी इथली जागा खाजगी विकासकाला दिली जाणार असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे गोंधळात आणखी भर पडली असून पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले आहेत.

कुंभमेळा काळात पुन्हा जागा महापालिकेच्या ताब्यात येईल : मनीषा खत्री

दरम्यान, दर १२  वर्षांनी कुंभमेळा भरतो, त्यामुळे कुंभमेळा व्यतिरिक्त या जागेचा उपयोग व्हावा, यासाठी MICE हब अर्थात मिटिंग, इंसेंटीव्हीज, कॉन्फरन्स एकझीबिशन सेंटर सुरू करण्याबाबतचे टेंडर काढण्यात आले आहे. कुंभमेळाच्या आधीच हे टेंडर कढल्यानं महापालिकाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे महापालिकेचे नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार करून, कुंभमेळाच्या जागेची देखभाल राहील, इथे कोणतेही पक्के बांधकाम होणार नाही, कुंभमेळा काळात पुन्हा जागा महापालिकेच्या ताब्यात येईल, असा खुलासा महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी केला आहे.

तसेच साधुग्रामच्या जागेवरील वृक्ष न तोडता नेहरू नगर, गांधी नगर, मेरीच्या वसाहतीत साधूच्या निवासाची व्यवस्था करा, अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत असल्याने कुंभमेळा काळात देशभरातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती मनीषा खत्री यांनी दिली. नाशिक शहराच्या नकाशाच्या माध्यमातून एक्सलुझिव्ह माहिती माध्यमांना दिली आहे.

झाडांची हत्या करण्याच्या निर्णयाला आमचा कडाडून विरोध – उद्धव ठाकरे

दरम्यान, याच मुद्दयांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडाडून विरोध केला असून या बाबत बोलताना ते म्हणाले, की साधुग्राम उभारण्याला आमचा विरोध नाही, पण साधुग्रामच्या नावाखाली तपोवनातील हजारो झाडांची हत्या करण्याच्या निर्णयाला आमचा कडाडून विरोध आहे. सरकार हे काम पुण्य कमावण्याचा उपद्व्याप दाखवत करत आहे, परंतु प्रत्यक्षात हा निसर्गविनाशाचा प्रयत्न असून यात हिंदुत्वाचा आडोसा घेतला जात आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यांनी विचारले की गेल्या कुंभमेळ्यात वापरलेली जागा यावेळी का वापरली जात नाही, नवी झाडे लावण्याइतकी रिकामी जागा असल्याचे सांगितले जाते तर साधुग्राम तिथेच का उभारला जात नाही? आधी निसर्ग मारायचा आणि नंतर “नवीन झाडे लावू” असा दिखावा करण्याचा हा भ्रष्टाचार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

अधिक वाचा