
लातूर : काल रात्री निवडणूक आयोगाच्या वतीने उशिरा एक जीआर काढून राज्यातील ज्या-ज्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर आक्षेप आहेत त्यांची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्षपदाच्या उमदेवाराच्या विरोधात जिथे अपिल होते आणि ज्याचा न्यायालयातून निकाल उशिरा लागला अशा रेणापूर नगर पंचायत नगराध्यक्षपदासह सर्व सदस्य निवडीसाठी मतदान लांबणीवर पडले असून २ डिसेंबर रोजी होणारे मतदान आता २० डिसेंबर रोजी होणार असल्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे.
निवडणूक आयोगाचा नवीन आदेश
रेणापूर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक निवडीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार होते. पण, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या विरोधात दाखल अपिलाचा निकाल काल २९ नोव्हेंबर रोजी लागला. राज्यातील काही नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक संदर्भात अशा कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्यानंतर निवडणूक आयोगने नव्याने आदेश पारित केला आहे.
मतदार, उमेदवारांमध्ये संभ्रम
राज्य निवडणूक आयोगाच्या कालच्या नवीन आदेशानुसार २० डिसेंबर रोजी रेणापूर नगर पंचायतेत मतदान होणार आहे. या ठिकाणी नगराध्यक्ष पद व प्रभाग क्र. १ मधील प्रत्येकी १ उमेदवाराविरूद्ध अपील होते, सुधारीत निवडणूक कार्यक्रम हा नगराध्यक्ष पद व प्रभाग १ साठी आहेच, पण उर्वरीत प्रभागातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघार घेणे, त्यांना चिन्हं वाटप होणार की नाही याबाबत संभ्रम आहे.
निवडणूक चोरीला गेली याचा आरोप – धीरज देशमुख
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडून भाजपाची बाजू घेतल्याचा आरोप केला होता. यानंतर राज्यातील निवडणुका झाल्या यामध्ये मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला होता याप्रमाणे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये जिथे भाजपा पिछाडीवर आहे. तिथे जाणीवपूर्वक निवडणुका पुढे ढकलण्याचा आरोप माजी आमदार धीरज देशमुख यांनी केला आहे. या मार्फत निवडणूकच चोरीला गेली असल्याचा घराघाती आरोप धीरज देशमुखांकडून करण्यात आला.





