
नवी दिल्ली – सातारा (Satara) जिल्ह्यातील सावरी गावात असणाऱ्या शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ४५ किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. या ड्रग्जची बाजारपेठेतील किंमत १४५ कोटी रुपये इतकी आहे, त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील हॉटेल तेज यश मधून जेवण जात असल्याचा असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहलं आहे, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, असे सावंत यांनी पत्रात म्हटलं आहे. संबंधित रिसॉर्ट कोयना धरणाच्या अत्यंत जवळ असल्याने ते बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे.
चौकशी होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना पदावरुन बाजूला करावे, अरविंद सावंतांची मागणी
धरणाजवळ असणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स साठा आढळल्या प्रकरणाची चौकशी व्हावी. तसेच चौकशी होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना पदावरुन बाजूला करावे अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे. या प्रकरणाकडे आवश्यक तेवढ्या गांभीर्याने पाहाल आणि न्याय व राष्ट्रहिताच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई कराल, असा विश्वास असल्याचा उल्लेख अरविंद सावंत यांनी पत्रात केला आहे.
अमली पदार्थ साठवलेल्या ठिकाणी रिसॉर्टपासून थेट रस्ता का बांधण्यात आला?
दरम्यान, या पत्रात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ साठवलेल्या ठिकाणी रिसॉर्टपासून थेट रस्ता का बांधण्यात आला? इतक्या मोठ्या प्रमाणावरील अमली पदार्थांची हालचाल असताना सातारा पोलीस यंत्रणेला याची माहिती कशी नव्हती? जर माहिती होती, तर राजकीय दबावामुळे कारवाई टाळण्यात आली का? असे सवाल या पत्रात अरविंद सावंत यांनी उपस्थित केले आहेत.
पत्रात नेमके काय म्हटले आहे?
सातारा जिल्ह्यातील सावरि गावात छापा टाकण्यात आला, जिथे एका दुर्गम भागात असलेले एक शेड आढळून आले आणि सुमारे ४५ किलो एमडी अमली पदार्थ (अंदाजे १४५ कोटी किमतीचे) जप्त करण्यात आले. या कारवाईत अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली. ही बाब आणखी गंभीर ठरते कारण हे शेड “तेज यश” नावाच्या रिसॉर्टपासून अवघ्या 1200 मीटर अंतरावर आहे. रिसॉर्टपासून थेट शेडपर्यंत रस्ता बांधण्यात आलेला असून, अशा प्रवेशमार्गामागील हेतूवर गंभीर प्रश्न निर्माण होतात. तसेच संबंधित रिसॉर्ट कोयना धरणाच्या अत्यंत जवळ असल्याने ते बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे. प्रचलित नियमांनुसार मोठ्या जलसाठ्याच्या ठराविक अंतरात कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे. अशा उल्लंघनाला परवानगी देणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका सखोल तपासणीस पात्र आहे असा उल्लेख अरविंद सावंत यांनी पत्रात केला आहे.





