ठाणे – अंबरनाथ नगरपालिकेत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. अंबरनाथ नगरपालिकेत निवडून आलेल्या ११ नगरसेवकांचा पुर्ण गटच भाजपात जाणार आहे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात जाहीर प्रवेश करणार आहे. तर काँग्रेसला रामराम करत हा गट भाजपात जाणार आहे. ठाण्यातील अंबरनाथमध्ये भाजपाने काँग्रेसला मोठा धक्का देत काँग्रेसच्या ११ नगरसेवकांना आपल्या पक्षात जाहीर प्रवेश देणार आहे.
ठाण्यामधील अंबरनाथमध्ये भाजपा आणि काँग्रेसने केलेली युती राज्यात चर्चेची ठरली आहे. येथील सत्ताधारी भाजपाला काँग्रेस नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावरुन पाठिंबा दिला होता. त्यावरुन, सुरू झालेल्या राजकीय वादानंतर, अंबरनाथ नगरपालिकेत मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथमधील भाजप-काँग्रेस युतीवरुन कडक कारवाई केली आहे. येथील काँग्रेस पक्षाने नगरपालिका निवडणुकीत भाजपाला समर्थन दिल्यानंतर काँग्रेसकडून येथील सर्वच नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले होते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरुन अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप पाटील यांना यासंदर्भात पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर, आता येथील काँग्रेसच्या तब्बल ११ नगरसेवकांनी काँग्रेसला बाय करत भाजपात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे, लवकरच हा पक्षप्रवेश होणार आहे.
अंबरनाथमध्ये भाजप काँग्रेसला मोठा धक्का देत काँग्रेसच्या ११ नगरसेवकांना आपल्या पक्षात घेणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे सर्व नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहेत. नवी मुंबईत हा पक्ष प्रवेश होणार आहे. काँग्रेसला बाय करत काँग्रेसचे ११ नगर सेवक भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत.
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये, काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आपण निवडणूक लढविली असून, आपल्या पक्षाचे १२ सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र, आपण प्रदेश कार्यालयास कोणतीही माहिती न देता अंबरनाथ नगरपालिकेमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचे कळाले. ही बाब अत्यंत चुकीची असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे. ही बाब लक्षात घेता प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून, आपणास काँग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे. तसेच आपली ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपल्या सोबत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांना सुध्दा पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे, असे पत्र काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी प्रमोद पाटील यांना पाठवले होते. त्यानंतर, नवनिर्वाचित ११ काँग्रेस नगरसेवकांच्या गटाने भाजपमध्ये जाहीररित्या प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंबरनाथ येथे भाजपाप्रणीत अंबरनाथ विकास आघाडी मध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला म्हणून, प्रदेश काँग्रेसने काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक आणि ब्लॉक अध्यक्षावर निलंबनाची कारवाई केली. पण ज्या काँग्रेस मुक्त भारताची कामना करतात त्याच काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना, भाजपाकडूनच आघाडीचा प्रस्ताव गेला असतानाही भाजपाने आपल्या नगरसेवकांवर कारवाई का केली नाही? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपला विचारला आहे.
अकोटमध्ये भाजपा एमआयएम सोबत जाऊन आघाडी करते. यातून स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू महासभेने मुस्लिम लीग बरोबर अनेक प्रदेशांत, सत्ता स्थापन केली त्याची आठवण झाली. दोन्ही कट्टरवाद्यांचा अजेंडा एकमेकांना पूरक असतो हे स्वातंत्र्यपूर्व काळानंतर, आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भाजपा आणि एमआयएम पडद्याआड एकच आहेत असे आम्ही म्हणत होतो. आता हे जवळीकीचे नाते प्रकाशात आले आहे. ध्रुवीकरणाचा अजेंडा कसा राबवला जातो हे जनतेला आता कळले आहे. भाजपा हा सत्तेसाठी तत्व, नीतीमत्ता आणि विचार गुंडाळून ठेवणारा पक्ष आहे हेच खरे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.





