अशोक खरात यांचा एन्काऊंटर? जितेंद्र शेळके यांचा भयंकर अपघातात मृत्यू… सुषमा अंधारे यांच्या त्या ट्वीटमुळे एकच खळबळ.

SHARE:

 संभाजीनगर : अशोक खरात याचा विश्वास सहकारी आणि शिवानिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. त्यात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. यावरून आता पुन्हा अशोक खरताच्या एन्काऊंटरची भीती व्यक्त होत आहे. काय आहे सुषमा अंधारेंचे ते ट्वीट?

छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी रस्त्यावरील धोत्रे गावाजवळ भीषण अपघात घडला. त्यात भोंदू अशोक खरात याचा अत्यंत जवळचा सहकारी आणि शिवानिका ट्रस्टचे संचालक, उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला. उभ्या असलेल्या कंटरनेला ही कार मागून जोरात धडकली. हा अपघात पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर जखमी मुलाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या भीषण अपघाताने आता अशोक खरातचा एन्काऊंटर होणार अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी याविषयीचे ट्वीट केले आहे, त्यावरून खळबळ उडाली आहे.

अत्यंत भीषण अपघात
धोत्रे गावाजवळ शिर्डीकडे जाताना उभ्या कंटेनरच्या मागे ही कार घुसली. समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. त्याची छायाचित्र आणि व्हिडिओ काळजाचा थरकाप उडवणारी आहेत. ही कार चक्काचूर झाली आहे. खरातचे प्रकरण समोर आल्यापासून जितेंद्र शेळके हे तणावात असल्याचे समोर येत आहे. शेळकेंच्या लॉन्समध्येही खरातची भागीदारी असल्याचे समोर येत आहे. आता या अपघाताने अनेक प्रश्न निर्माण केले आहे. हा अपघात होता की घातपात होता यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू होतील. तर आतापासूनच अशोक खरातच्या एन्काऊंटरची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. खरातचे राजकीय आणि प्रशासकीय कनेक्शन पाहता, त्याच्याकडे अनेकांचे रहस्य दडलेले आहेत. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका आहे, असा दावा विरोधक सातत्याने करत आहेत.

सुषमा अंधारे म्हणाल्या काय? .

खरात प्रकरणातील महत्त्वाची कडी शिवानिका ट्रस्टचे संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट अविश्वसनीय वाटते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि भीती वर्तवली आहे की, खरातच्या जीवाला धोका असू शकतो. शेळकेंची जी घटना झाली आहे, त्यामुळे खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो ही अनेकांनी व्यक्त केलेली शंका यानिमित्ताने अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे. कदाचित खरात प्रकरणातील सत्यच बाहेर येऊ नये असे काहींना वाटते का, असा सवाल खरात यांनी उपस्थित केला. तरीही SIT तपासाची गती वाढवत नसेल. या लोकांच्या चौकश्या होत नसतील, तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढू शकतं. शेळके हे गुन्हेगार होते की नाही हे कायदा ठरवेल. त्याची शिक्षा कायद्याने द्यायला हवी. पण कुणाचाही जीव घेण्याचा कुणालाच अधिकार नाही. पण जी घटना आज घडली, ती मात्र एकूण शासन व्यवस्था आणि तपास यंत्रणांवर प्रश्न निर्माण करणारी आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Leave a Comment

अधिक वाचा