खतांचा काळाबाजार आणि लिंकिंग रोखण्यासाठी कारवाई; १० कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर ६ केंद्रांना सक्त ताकीद

SHARE:

(टीप - फोटो AI जनरेटेड आहे.)

अमरावती – खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि कृषी निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी अमरावती जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यात मोठी कारवाई आहेत. धडक मोहिम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, त्रुटी आढळलेल्या इतर ६ केंद्रांना प्रशासनाने कडक ताकीद दिली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली आहे.

खरीप हंगामात बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री होऊ नये, तसेच शेतकऱ्यांकडून छापील किमतीपेक्षा जास्त दराने वसुली केली जाऊ नये, यासाठी जिल्ह्यात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. एप्रिल २०२६अखेरपर्यंत जिल्ह्यातील १०० टक्के कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे. ज्या केंद्रांच्या ई-पॉस (e-POS) मशीनवरील खतांचा साठा आणि दुकानातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठी तफावत आढळून आली, अशा १७ विक्रेत्यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीअंती दोषी आढळलेल्या १० विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमध्ये प्रामुख्याने साठ्यात तफावत असणे, अवाजवी दराने विक्री करणे, पक्के बिल न देणे, अनधिकृत बियाण्यांची साठवणूक करणे आणि बंदी असलेल्या एच.टी.बी.टी. (HTBT) कापूस बियाण्यांची विक्री करणे यांसारख्या गंभीर बाबी कारणीभूत ठरल्या आहेत.

कृषी विभागाने शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बियाणे किंवा खते खरेदी करताना केवळ अधिकृत परवानाधारकांकडूनच खरेदी करावी आणि त्याचे पक्के बिल आवर्जून घ्यावे. जर कोणत्याही केंद्रावर खतासोबत इतर अनावश्यक उत्पादने (लिंकिंग) घेण्याची सक्ती केली जात असेल किंवा अवाजवी दर आकारले जात असतील, तर शेतकऱ्यांनी ८०८०५३६६०२
या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

 

Leave a Comment

अधिक वाचा