स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात अर्ज करणे बंधनकारक; 15 जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

SHARE:

अमरावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये समाज कल्याण विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच सर्व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे अनिवार्य केले आहे. पात्र विद्यार्थ्यांनी आगामी 15 जुलै 2026 पर्यंत महाआयटीच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://hmasnew.mahait.org) रितसर ऑनलाईन अर्ज नोंदवणे बंधनकारक राहील.

शासनाच्या नव्या नियमांनुसार, ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला आहे आणि केवळ गुणवत्तेनुसार अथवा शासकीय वसतिगृहात जागा उपलब्ध न झाल्यामुळे ज्यांना प्रवेश मिळाला नाही, असेच विद्यार्थी पुढील टप्प्यात स्वाधार योजनेच्या आर्थिक लाभासाठी पात्र धरले जातील.

चालू शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणार नाहीत, त्यांना स्वाधार योजना तसेच शासकीय वसतिगृह योजना या दोन्ही महत्त्वाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागेल. भविष्यात स्वाधार योजनेचा लाभ घेताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे. या योजनेच्या अटी, शर्ती व अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ‘सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, चांदूर रेल्वे रोड, सी.पी. ऑफिसच्या मागे, अमरावती’ येथे किंवा speldswo_amt@rediffmail.com या ई-मेलवर अथवा 0721-2661261 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती.)

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा