‘लग्नसंस्था जुनी झालीये…’, जया बच्चन यांचं स्पष्ट मत, नात नव्यानंही लग्न करु नये, व्यक्त केली इच्छा…

SHARE:

मुंबई – बॉलिवूडचे महानायक बिग बी यांच्या पत्नी दिग्गज अभिनेत्री तथा खासदार जया बच्चन, या ना त्या कारणानं चर्चेत असतात. कधी त्यांचे राज्यसभेतल्या भाषणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर, कधी त्यांचे पॅपाराझींवर खेकसतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात. पण, सध्या त्या चर्चेत आल्या आहेत त्या, एका पॉडकास्टमध्ये त्यांनी लग्नाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना जया बच्चन यांनी लग्न संस्थेवर भाष्य केलंय. तसेच, लग्न ही संकल्पना ‘जुनी’ असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यासोबतच ७७  वर्षीय जया बच्चन यांना त्यांची नात नव्या नवेली नंदा हिनं लग्न करुच नये, असं वाटतं.

कार्यक्रमात बोलताना प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एका महिलेनं विचारलं की, लहान मुलांचं संगोपन करणाऱ्या मातांना तुम्ही काय सल्ला द्याल…? यावर बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, “मी आता एक आजी आहे. नव्या पुढील आठवड्यात २८  वर्षांची होईल. कदाचित मी खरंच खूप वयस्कर असेल की, मी सांगावं महिलांनी मुलांचं संगोपन कसं करावं? कारण हल्लीची मुलं खूपच स्मार्ट आहेत, त्यांना आधीपासूनच खूप काही माहीत असतं. सध्या गोष्टी खूपच बदलल्या आहेत. सध्याची लहान मुलं खूपच हुशार झाली आहेत. ते तुमच्यापेक्षाही हुशारीने वागतील.”

नातीच्या लग्नाच्या विरोधात आहेत, आज्जी जया बच्चन

याच प्रश्नाला जोडून जया बच्चन यांना नात नव्याला धरुन एक प्रश्न विचारण्यात आला. लग्नानंतर त्यांची नात नव्यानं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत, करिअर सोडलं तर ते त्यांना आवडेल का? प्रश्न संपताच जया बच्चन यांनी तात्काळ उत्तर दिलं की, “मुळात, नव्यानं लग्न करावं असंच मला वाटतंच नाही. आजकालची मुलं कोणालाही मागे टाकू शकतात.” त्यांच्या या उत्तरावर त्यांना पुढे विचारण्यात आलं की, “लग्न ही एक जुनी संस्था आहे, असं वाटतं का?” यावर त्या म्हणाल्या की, “होय, संपूर्णत:…” दरम्यान, ‘वी द वुमन’ या शोमध्ये त्या बोलत होत्या.

…तर तुम्हाला पश्चात्ताप होईल : जया बच्चन

जया बच्चन यांनी लग्नाची तुलना ‘दिल्ली का लड्डू’ शी केली. त्या म्हणाल्या की, “जर तुम्ही हे लाडू खाल्ले तर तुम्ही अडचणीत पडाल. आणि जर तुम्ही ते खाल्ले नाही तर तुम्हाला पश्चात्ताप होईल…” जया बच्चन आणि नव्या त्यांच्या प्रोग्रेसिव थिंकिंगसाठी ओळखल्या जातात. जया बच्चन म्हणाल्या की, आम्ही आमच्या काळात कुटुंबाबाबतच्या विचारासाठी एवढे मोकळेपणानं विचार करू शकत नव्हतो, जेवढी आजकालची मुलं करतात. इमोशनल आणि मेंटल कम्पॅटिबिलिटी खूपच गरजेची असते.

जया बच्चन म्हणाल्या की, “लोक माझ्या म्हणण्यावर आक्षेप घेऊ शकतात, पण शारीरिक आकर्षण आणि सुसंगतता खूप महत्वाची आहे. आपण आपल्या काळात हे प्रयत्न करू शकत नव्हतो, पण आजची पिढी करू शकते, आणि त्यांनी का करू नये? दीर्घकालीन नातेसंबंधासाठी हे देखील आवश्यक आहे…” लग्नापूर्वी मुलं होण्याबद्दल जया बच्चन म्हणाल्या की, “प्रेम आवश्यक आहे, तेच महत्त्वाचं आहे, दुसरं काही नाही…”

Leave a Comment

अधिक वाचा