भाजपकडून तोच खेळ पुन्हा; मोठ्या भावाचा सुपरहिट फॉर्म्युला; ‘त्या’ प्रस्तावानं शिंदेसेनेत अस्वस्थता…

SHARE:

मुंबई : भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेत १५० जागा लढण्याच्या तयारीत आहे. २२७ प्रभाग असलेल्या मुंबई महापालिकेसाठी भाजप नं १५०-५०-२७ चा प्रस्ताव तयार केला आहे. मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होईल. १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. भाजप मुंबईत मोठा भाऊ असेल. त्यांनी १५० जागा लढवण्याची तयारी करत शिंदेसेनेला ५० जागा देऊ केल्या आहेत. तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्यास त्यांना २७ जागा सोडण्याची तयारी दर्शवण्यात आली.

मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि शिंदेसेनेचे नेते उदय सामंत यांच्यात जागावाटपासंदर्भात चर्चा झाली. भाजप १५० जागा लढवण्यासंदर्भात कोणतंही दुमत नाही. अन्य जागांवर चर्चा होईल, असं अमित साटम यांनी सांगितलं. बाकीच्या जागांचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं सुत्रांच्या अहवालानुसार दिलेल्या वृत्तानुसार, भाजप १५० पेक्षा अधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या निवडणुकीत आम्ही ८२ जागा जिंकल्या. सोबत ५० हून अधिक जागा केवळ बंडखोरीमुळे गमावल्या. या प्रभागांमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार आणि भाजपचे बंडखोर उमेदवार यांच्या मतांची बेरीज विजयी झालेल्या उमेदवारापेक्षा अधिक होते, असा तर्क भाजपकडून दिला जात आहे.

‘भाजपनं १५० हून जागांवर दावा केला आहे. आम्ही शिवसेनेला ५० जागा देण्यास तयार आहोत. बाकीच्या २७ जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडल्या जातील. नवाब मलिक यांच्या नेतृत्त्वाचा मुद्दा निकाली निघाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस सोबतही युती होईल,’ अशी माहिती सुत्रांच्या हवाल्यानं देण्यात आली आहे.

भाजपनं दिलेल्या ५० जागांच्या प्रस्तावामुळे शिंदेसेनेत तीव्र नाराजी आहे. आम्हाला किमान ७० जागा द्या, अशी शिंदेसेनेची मागणी आहे. ‘आम्ही केवळ ५० जागा लढवल्या, तर अधिक जागा जिंकण्याच्या शक्यता कमी होतात. त्यामुळे मुंबईतील आमचं प्राबल्य संपुष्टात येईल. भाजपनं १०० च्या आसपास जागा जिंकल्यास त्यांना कदाचित आमची गरज भासणार नाही. छोटे पक्ष आणि अपक्षांच्या साथीनं ते बहुमताचा आकडा गाठू शकतील. त्या परिस्थितीत त्यांना शिवसेनेची आवश्यकता नसेल. आम्हाला ती परिस्थिती नको आहे,’ असं शिंदेसेनेतील नेत्यानं सांगितलं.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेसेनेचं महायुतीमधील महत्त्व एकाएकी घटलं. कारण त्यावेळी भाजपनं १४९ जागा लढवून १३२ जागा जिंकल्या. तर शिंदेसेनेनं ८१ जागा लढवत ५७ जागांवर बाजी मारली. भाजपनं अधिक जागा लढवत बहुमताच्या आसपास जातील इतक्या जागांवर विजय मिळवला. त्यामुळे शिंदेसेनेची कोंडी झाली. तोच खेळ पालिकेत होऊ नये यासाठी शिंदेसेना सावध आहे.

Leave a Comment

अधिक वाचा