मुंबई : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सपाटून आपटल्यानंतर भाजपकडून विरोधकांवर तोंडसुख घेणे सुरू आहे. भाजपकडून आगपाखड सुरू झाली आहे. तर त्याचवेळी हे बिल 2023 मध्येच विरोधकांच्या मतदानाने मंजूर करण्यात आल्याचे पुरावेच काँग्रेसने आता समोर आणले आहे. सपकाळांनी तर तोफच बगलेत घेत दारुगोळा उडवला आहे.
महिला आरक्षण विधेयकाच्या आडून मतदार संघ पुनर्रचनेचा भाजपचा डाव हाणून पाडला असा दावा विरोधक करत आहे. नारी शक्ती वंदन बिल हे काल दणकावून आपटले. विरोधकांची अभूतपूर्व एकजूट दिसली. त्यानंतर भाजपने या सर्व प्रकरणात विरोधकांवर हल्लाबोल सुरू केला आहे. विरोधक बिल नामंजूर करून त्याचा जल्लोष करत असल्याचा आरोप भाजप गोटातून करण्यात येत आहे. देशातील अनेक भागात भाजप आमदार, खासदार रस्त्यावर उतरले आहे. नारी शक्तीचा हा अवमान असल्याचा आरोप भाजप करत आहे. तर दुसरीकडे २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक विरोधकांच्या पाठिंब्यावरून मंजूर झाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तर त्यावेळेसच भाजप आमदार, खासदारांचे ट्वीटच आता धडाधड समोर आणले जात आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर मुख्यमंत्र्यांवर मोठी तोफ डागली आहे. त्यांच्या ट्वीटने खळबळ उडवून दिली आहे.
मुख्यमंत्र्यांचा खोटरडेपणा उघड
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक ट्वीट केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांनी या ट्वीटमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यांनी फडणवीस यांच्या मागील ट्वीटचा उल्लेख करत ही टीका केली आहे.
“हा पहा मुख्यमंत्री देवेंद्रपंत फडणवीसांचा खोटारडेपणा. महिलांना आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्याने ३ वर्षांपूर्वीच २०२३ मध्ये पारीत झाले होते. याबद्दल पंतांनी तेव्हा विरोधकांचा उल्लेखही न करता केवळ पंतप्रधानांचे आभार मानत अभिनंदन केले होते. आज लोकसभेने ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयक’ फेटाळले आहे.मात्र महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याचा कांगावा राज्याचे मुख्यमंत्री करतात! शेम ॲान यू पंत!” असे ट्वीट करून सपकाळांनी निशाणा साधला आहे.
डणवीस यांच्या त्या ट्वीटमध्ये काय?
“ऐतिहासिक क्षण! लोकसभेने आज महिला आरक्षण विधेयकाला बहुमताने मंजूरी दिली. विधेयकाच्या बाजूने ४५४ मते पडली. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये यामुळे महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळेल. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांपैकी हे सुद्धा एक ऐतिहासिक पाऊल आहे. देशात रखडलेले अनेक प्रश्न निर्णयशून्यता आणि कर्तव्यशून्यतेमुळे अनिर्णित होते. आज नवा भारत सर्वसमावेशकतेच्या, सर्वांच्या समान भागिदारीतून विकासाच्या एका नव्या मार्गावर वाटचाल करतोय. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे खूप खूप आभार !संपूर्ण देशभरातली नारीशक्तीचेही मनःपूर्वक अभिनंदन!” असे ते ट्वीट आहे. त्यावरुन सपकाळांनी निशाणा साधला आहे.




