मेळघाटातील कुपोषण नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करणार – महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे

SHARE:

अमरावती : मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत शासन सकारात्मक पावले उचलत असून गेल्या काळात कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. येत्या काळातही माता आणि बाल संगोपनासाठी विविध उपयोजना करण्यात येऊन मेळघाटातील कुपोषण नियंत्रित करण्यावर भर देण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

धारणी येथील तहसील कार्यालयात मेळघाटातील विविध प्रश्नाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी प्रभुदास भिलावेकर, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त डॉ. माधवी सरदेशमुख,महिला बालविकास उपायुक्त विलास मसराळे आदी उपस्थित होते.

श्रीमती तटकरे म्हणाला, मेळघाटात काही प्रमाणात बालविवाहाची समस्या आहे. त्यामुळे कमी वयात मातृत्व येत असल्याने कुपोषित बालके जन्माला येण्याची शक्यता असते. यावर उपाययोजना म्हणून बालविवाहासोबतच मातांना पोषक आहार मार्गदर्शनासाठी महिला सेविकेची निवड करून तिला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सेविकेमार्फत आदिवासींना समजेल अशा भाषेत आरोग्यविषयक माहिती देण्यात येणार आहे. तसेच बाळ जन्माला आल्यानंतर 1 हजार दिवसांच्या आहाराचे नियोजन करण्यात येणार आहे. शासनाच्या या उपाययोजनांमुळे कुपोषित बालके जन्माला येण्यापासून बचाव होणार आहे.

मेळघाटातील अंगणवाडी स्मार्ट करण्यासाठी विजेच्या सोयीसाठी सोलार, स्वच्छतागृह आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी गरोदर मातांना देण्यात येणारा आहार त्यांनी त्याच ठिकाणी घ्यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. दर्जेदार आहार मिळण्यासाठी आहार समिती सक्रिय करावी. यामध्ये समाजातील विविध घटकांचा समावेश करावा. जिल्हा नियोजनच्या निधीमधून अंगणवाडी बांधकामासाठी मिळणारा निधी एक वर्षाच्या आत खर्च करावा. खर्च करणे शक्य नसल्यास बांधकाम विभागाला एजन्सी म्हणून नेमून कामे तातडीने पूर्ण करावीत.

आदिवासींच्या मनात आरोग्य यंत्रणेबद्दल गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच रुग्णालयात होणाऱ्या प्रसुतींमध्ये नैसर्गिक प्रसुती होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यामुळे आदिवासींना सिजरची असणारे भीती कमी होण्यास मदत होईल. महिला आणि आदिवासींकरिता असलेल्या योजनांची माहिती ग्रामसभेमधून देण्यात यावी. महिलादिनी होणाऱ्या ग्रामसभेत प्रामुख्याने महिलांच्या योजना सांगण्यात याव्यात.

मेळघाटातील कुपोषणाच्या बाबतीत मध्यम तीव्र कुपोषण आणि गंभीर तीव्र कुपोषण हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. मध्यम तीव्र कुपोषण जरी कमी असला तरी यात सुधारणा करण्यात यावी. गंभीर तीव्र कुपोषणची आकडेवारी 100 च्या आत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

आजच्या दौऱ्यादरम्यान श्रीमती तटकरे यांनी भोकरबर्डी, धुळघाट, कळमखार, लवादा आणि चित्री येथे अंगणवाडी केंद्रांना भेट दिली. तसेच बालके आणि आदिवासी समूहाशी संवाद साधला.

(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती.)

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.

Leave a Comment