गुरु जीवनाचे शिल्पकार आणि कृतज्ञतेचे महासागर; गुरु पौर्णिमेनिमित्य विशेष लेख व अभंग…

SHARE:

दि. २९ जुलै २०२६ ला असलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख आणि त्यांच्या ‘अभंग तरंग’ या काव्यसंग्रहातील ‘आदर्श शिक्षक’ हा अभंग येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

गुरु पौर्णिमेचे महत्व –

ज्ञानाचा दिवा, कृतज्ञतेचे महासागर, सत्यधर्माचे ज्ञानदाते, जीवनाचे शिल्पकार, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असलेल्या सर्व आदरणीय गुरुंना दि. २९ जुलै २०२६ ला असलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र वंदन ॥

गुरुपौर्णिमा हा भारतामध्ये अतिशय उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील पूर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. हिंदू संस्कृतीत गुरूला देवापेक्षाही वरचे स्थान आहे. गुरू आपल्याला तिमिराकडून प्रकाशाकडे नेतात. ते आपल्या जीवनातील अज्ञानाचा नाश करून तेथे ज्ञानाचा उजेड पेरतात . गुरुशिवाय जीवनाला योग्य दिशा मिळत नाही. जीवनातील गुरूंचे स्थान फार महत्वाचे आहे . आपल्या जीवनातील पहिली गुरू आपली आई असते. वडील आपल्याला जगात जगायला शिकवतात. गुरू आपल्याला साक्षर करून ज्ञानाचा प्रकाश देऊन जीवन समृद्ध करतात . गुरू आपल्यावर चांगले संस्कार करतात. ते आपल्यातील गुणांना योग्य आकार देतात. आपल्या चुका सुधारून योग्य मार्ग दाखवतात. कठीण काळात आपल्याला धीर देतात. यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतात. गुरूंचे ऋण आपण कधीही विसरू शकत नाही.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण भारतात गुरूंचे पूजन केले जाते. शिष्य आपल्या गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. अनेक लोक या दिवशी गुरुमंत्र घेतात. विद्यार्थी आपल्या शिक्षकांना फुले आणि भेटवस्तू देऊन गुरूंचे आशीर्वाद घेतात. हा सण आपल्याला नम्रता शिकवतो. गुरू हा ज्ञानाचा अथांग सागर आहे. आपल्या गुरूंना सदैव मान देणे हे आपले कर्तव्य आहे. गुरू म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहे. शिष्यांना घडवणारे आहेत. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवा म्हणजे गुरू, गुरू जीवनाला एक नवी दिशा देतात. आई-बाबा जन्म देतात पण जगण्याचे मार्ग गुरूच दाखवितात. अक्षरांची ओळख आणि संस्कारांची शिदोरी, गुरूच्या चरणीच असते. गुरू चुकल्यावर प्रेमाने रागावतात, योग्य काय आणि अयोग्य काय हे शिकवितात. जीवन प्रवासात जीवन जगताना गुरुच मार्गदर्शन करतात आणि शिष्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवितात. अशा या सर्व महान गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त कोटी कोटी प्रणाम ॥

आदर्श शिक्षक

आदर्श शिक्षक । ज्ञानाचा सुगंध ।।
मंदिरात गंध । चोहिकडे ।।१।।

शाळा आणि फळा । गुरुंचे जीवन ।।
संस्कार पावन । होत जाती ।।२।।

अभ्यासाचे तंत्र । सांगतसे गुरू ।।
अभ्यास तो सुरू । नियमित ।।३।।

सर्व विद्यार्थ्यांना । समान वर्तन ।।
विद्यार्थ्यांचे मन । आनंदित ।।४।।

सुसंस्कार देई । शिक्षक आदर्श ।।
विद्यार्थी सहर्ष । घडतसे ।।५।।

आदर्श गुरुंचा । ध्यासच मंथन ।।
वाचन चिंतन । करितसे ।।६।।

ग्रंथ वाचनाचे । मोल सांगे गुरू ।।
वाचन ते सुरू । विद्यार्थ्यांचे ।।७।।

आदर्श शिक्षक । प्रकाश विद्येचा ।।
लय तिमिराचा । करितसे ।।८।।

 

लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
साहित्यिक,
काँग्रेस नगर, अमरावती.
संपर्क : ८०८७७४८६०९

प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सामाजिक क्षेत्रातील असंख्य अश्या पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment