महाराष्ट्र राजकारण : मनसे-उद्धवसेनेत वादाची ‘मशाल’ पेटली, राज ठाकरेंच्या ‘त्या’ ११ उमेदवारांवरुन धुसफूस, ठाकरे गटाकडून नाराजी मान्य

SHARE:

ठाणे : शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात अंबरनाथमध्ये शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी युती करीत लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विरोधकांना रोखण्यासाठी एकत्र आलेल्या युतीत निवडणुकीपूर्वीच धुसफूस सुरू झाल्याचे बोलले जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेने विरोधात लढणाऱ्या उबाठाच्या निष्ठावंताना डावलत त्या प्रभागात मनसेच्या उमेदवारांना प्राधान्य देत उमेदवारी दिल्यावरून उबाठा आणि मनसेतही नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत यंदा युती, आघाडीतील बिघाडीने अनेक पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात शिवसेना, भाजप यांच्यात खरी लढत होणार असली, तरी युतीतील राष्ट्रवादी आणि मविआतील काँग्रेसही नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरली आहे. तर दुसरीकडे मविआतील शिवसेना उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी (शप) यांनी युती करत उबाठाचा उमेदवार नगराध्यक्षपदी दिला आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच मविआत शिवसेना (उबाठा) आणि मनसेत काही ठिकाणी जागा वाटपावरून धुसफूस सुरू असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनाच्या (उबाठा) निष्ठावंतानी शिवसेनेविरोधात लढाई लढली होती. त्यामुळे उबाठाचे अनेक पदाधिकारी पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक होते. मात्र शिवसेनाकडून(उबाठा) ३५ तर मनसेकडून ११ उमेदवार देण्यात आले असून मनसेचे उमेदवारही उबाठाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. मात्र उमेदवारी देताना काही ठिकाणी उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना डावलून मनसेच्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याने नाराजी पसरल्याचे बोलले जात आहे.

याबाबत मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना विचारले असता, दोन्ही पक्षाच्या स्थानिक प्रमुखांनी समन्वयाने जागा वाटप केले आहे. त्यासाठी मनसेनेही १७ आणि २४ प्रभागांतून आपल्या दोन जागा उबाठासाठी सोडल्या आहेत. त्यामुळे जागा वाटपावरून कुठलीही धुसफूस नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर एक, दोन ठिकाणी जागा बदलाने नाराजी असल्याचे शिवसेना, उबाठा शहरप्रमुख अजित काळे यांनी मान्य केले. मात्र यासह उबाठाकडून अंजली राऊत यांना नगराध्यक्षपद दिल्याने नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यानी काळे यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत आपण नगराध्यक्षपदासाठी काम करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या दिवसात उबाठा, मनसे यांच्या युतीतील नाराजी नाट्य थांबवण्यात वरिष्ठ किती यशस्वी होतात यावर पुढची गणिते अवलंबून आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा