७३ वर्षांच्या इतिहासात दोंडाईचा नगर परिषद पहिल्यांदाच बिनविरोध; सर्व जागांवर भाजपचे उमेदवार, जयकुमार रावलांनी काय राजकारण केलं?

SHARE:

दोंडाईचा नगर परिषद निवडणूक : राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांना धुळे जिल्ह्यातील जवळपास ७० हजार लोकसंख्या असलेल्या दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक पूर्णतः बिनविरोध करण्यात यश आले आहे. नगराध्यक्षांसह एकूण १३ प्रभागातील सर्व २६ जागांवरील भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

भाजपाच्या विरोधात वेगवेगळ्या प्रभागातून शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, एम.आय.एम., समाजवादी पार्टी, अपक्ष अशा विविध पक्षांकडून उमेदवार उभे करण्यात आले होते. परंतु माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्याने दोंडाईचा नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध झाली आहे. दरम्यान,1952 साली स्थापन झालेल्या दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेची निवडणूक प्रथमच बिनविरोध पार पडली आहे.

जयकुमार रावलांनी काय राजकारण केलं?

दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत गेल्या ४० वर्षापासूनचा संघर्ष बाजूला सारून डॉ. हेमंत देशमुख गटाला भाजपावासी करण्यात मंत्री जयकुमार रावल यांना यश आले. त्यानंतर रणनिती आणून मंत्री रावल यांनी सुरुवातीला नगराध्यक्ष नयनकुंवरताई रावल व ७ जागा बिनविरोध करण्यात यश मिळविले. माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरीत सर्व १९ जागांवरील भाजपाच्या उमेदवारांना बिनविरोध करण्यात जयकुमार रावल यांनी यश मिळविले आहे. दोंडाईचा नगर परिषदेत गेली चार दशके भाजपचा कट्टर विरोध मानला जाणारा डॉक्टर हेमंत देशमुख यांचा गट हा भाजपा दाखल झाला. मंत्री रावल यांच्या नेतृत्वाखाली व पक्षाच्या उच्चस्तरीय चर्चेनंतर हा ऐतिहासिक तिढा सुटला. या महत्वपूर्ण बदलामुळे दीर्घकाळ चाललेला राजकीय संघर्ष संपुष्टात आला आणि बिनविरोध निवडणूक प्रक्रियेचा पाया मजबूत झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, एकीकडे मंत्री जयकुमार रावल यांचा करिष्मा पाहायला मिळत असला तरी दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह राजकीय वर्तुळातून निर्माण केले जात आहे. मंत्री जयकुमार रावल यांनी अशी कोणती राजकीय समीकरणे फिरवली की ज्यामुळे महाविकास आघाडीसह सर्वच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

बिनविरोध नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची नावे

नगराध्यक्षा पदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुंवरताई रावल, प्रभाग क्र.१ मध्ये मुकेश गणसिंग देवरे, रविना महेशकुमार कुकरेजा, प्रभाग क्र.२ मध्ये सरलाबाई छोटू सोनवणे व शेख शिबान अहमद रियाज अहमद, प्रभाग क्र.३ मध्ये अक्षय वसंत चव्हाण, सुपौयाबी मेहमुद बागवान, प्रभाग क्र. ४ मध्ये कल्पनाबाई गोपाल नगराळे, पिंजारी शेख नबु शेख बशिर, प्रभाग क्र.५ मध्येविजय जिजाबराव पाटील व भारती विजय मराठे, प्रभाग क्र.6 मध्ये वैशाली शरद कागणे व सुभाष कांतीलाल धनगर, प्रभाग क्र.७ मध्ये देवयानी संजोग रामोळेचतूर जिभाऊ पाटील, प्रभाग क्र.८ मध्ये नरेंद्र नथ्थुसिंग गिरासे व राणी राकेश अग्रवाल, प्रभाग क्र.९ मध्ये वैशाली प्रवीण महाजन व निखीलकुमार रविंद्रसिंग जाधव, प्रभाग क्र.१० मध्ये अपूर्वा चिरंजीवी चौधरी व जितेंद्र धनसिंग गिरासे, प्रभाग क्र.११ मध्ये भावना हितेंद्र महाले व रविंद्र भास्कर देशमुख, प्रभाग क्र.१२ मध्ये सरजू वेडू भिल व सुवर्णा युवराज बागुल, प्रभाग क्र. १३ मध्ये भरतरी पुंडलिक ठाकुर व ललिता जितेंद्र गिरासे आदी नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडुन आले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा