
बृहन्मुंबई महानगपालिका निवडणूक : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आज मुंबईत शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांच्या पक्षाने बिएमसी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिले. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीत युतीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. भाजप सोडून इतरांसोबत युती करण्यास हरकत नाही. समाजवादी पक्ष किंवा मनसे सोबतदेखील युती करण्यास हरकत नाही, अशी एकंदर भूमिका राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत मांडण्यात आली.
गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेऊन आगामी पालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र यायला हवे, याबाबत चर्चा केली होती. काँग्रेसकडून महाविकास आघाडी व्हायची असेल तर मनसे नको, अशी भूमिका घेण्यात आली होती. शरद पवारांकडून पुढील आठवड्यात पक्षांतर्गत बैठक घेऊन निर्णय घेण्याबाबत काँग्रेसला आश्वासनही देण्यात आले होते. त्यामुळे शरद पवार मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणाच्या बाजूने मैदानात उतरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर शरद पवार यांनी मुंबईत ठाकरे बंधूंसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसेला सोबत घ्यायचे की नाही, याबाबत काँग्रेस पक्षात मतभेद दिसत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले होते की, शरद पवार यांनी आपण आघाडीत लढलो पाहिजे ही भूमिका मांडली आहे. भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे अशी आमची ही भूमिका आहे. आम्ही त्यासंदर्भात सकारात्मक आहोत, असे सांगत विजय वडेट्टीवार यांनी मनसेसोबत एकत्र येण्याच्या पर्यायाचा विचार होऊ शकतो, असे संकेत दिले होते. मात्र, मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली होती. विजय वडेट्टीवार यांनी जी भूमिका मांडली आहे, ती प्रदेश काँग्रेसबद्दल मांडली असेल. आम्ही मुंबई काँग्रेसचा निर्णय घेतलेला आहे. मारझोड करणाऱ्या, हाणामारी करणाऱ्या पक्षांसोबत जायचं नाही, हे आम्ही ठरवले आहे. समविचारी पक्षांसोबत आमचं बोलणं सुरु आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचा पक्षाचा निर्णय घ्यावा. आमची जोडण्याची भूमिका आहे, तोडण्याची नाही, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते.





