
नागपूर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना ‘ऑपरेशन लोटस’ या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजप पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या विधानावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट प्रतिहल्ला चढवत पटोले यांच्या वक्तव्याला वैफल्यग्रस्त मनस्थितीचे परिणाम असल्याची टीका केली आहे.
“नाना पटोले दोनशे मतांनी जिंकून आले होते. त्यांना पुढील पराभव निश्चित दिसत असल्यामुळेच ते अशी विधाने करत आहेत. काँग्रेसमध्येच विसंवाद आणि अस्थिरता वाढत आहे. त्यामुळे लोक काँग्रेस सोडत आहेत. भाजपला कोणतेही ऑपरेशन करण्याची गरज नाही, काँग्रेसचे नेते स्वतःहून आमच्याकडे येत आहेत”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी वाढत आहे. नाना पटोले यांनी अलीकडेच त्यांच्या गड मानल्या जाणाऱ्या साकोली येथे देखील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला. हेच वास्तव नाना पटोले स्वीकारत नाहीत आणि त्यावर पडदा टाकण्यासाठी ऑपरेशन लोटसचा मुद्दा पुढे करत आहेत”, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
“भाजपमध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी प्रवेशासाठी इच्छुक आहेत. आम्हाला अनेक लोक भेटले आहेत. पण आम्ही त्यांना दोन तारखेचा निकाल लागेपर्यंत थांबण्यास सांगितले आहे. नगर पालिका निकालानंतर काँग्रेसमध्ये मोठे राजकीय खिंडार पडण्याची भीती पटोले यांनी मनात धरली आहे, म्हणूनच ते अशा प्रकारचे आरोप करत आहेत. काँग्रेसची बचाव मोहीम सुरू आहे. पक्षात स्पष्ट नेतृत्व नाही, समन्वय नाही. अनेक नेते भाजपसोबत उभे राहण्यास इच्छुक आहेत”, असा मोठा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
“तीन तारखेला निकालाच्या दिवशी कळेल, संध्याकाळी आम्ही बसू, चार तारखेला बसू, पण महायुतीमध्ये हे ठरलं होतं ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष त्या त्या ठिकाणी टीका टीपण्णी न करता मैत्रिपूर्ण निवडणुका लढा. राज्यात महायुतीत नगरपालिका निवडणुकीत जे मतमतांतरे झाले त्याचा काही फरक पडणार नाही. महायुतीत जो समन्वय आहे तो आम्ही पुन्हा निर्माण करु आणि समन्वयाने पुन्हा या राज्यातील महायुती टिकाऊ”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.





