‘आम्हाला खडसेंचं चॅलेंज नाही, ते २०१९ मध्येच संपले’, शिवसेनेच्या संजना पाटील यांचं वक्तव्य

SHARE:

 

जळगाव : शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यावर टीका केली आहे. खरंतर आज प्रचाराचा शेवटचा दिवस असला तरी अनेक शहरांमध्ये नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वात चुरशीची लढत म्हटली म्हणजे मुक्ताईनगर. याकडे सगळ्यांचे विशेष लक्ष आहे. एकीकडे भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. मुक्ताईनगरच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. संजना पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे आव्हान आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “खडसे २०१९  मध्येच संपले”, अशी प्रतिक्रिया संजना पाटील यांनी दिली आहे.

मुक्ताईनगर म्हटलं म्हणजे सर्व राज्याला ज्ञात असलेले एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांची लढाई. आता तर नगर परिषदेची निवडणूक ही पक्षांची राहिली नसून खडसे विरुद्ध पाटील अशी झाली आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. भाजपने मुक्ताईनगर शहरात स्वतंत्र भाजपचे पॅनल उभे केले आहे. तर दुसरीकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे पॅनल स्वतंत्र उभे केले आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची मानली जात आहे.

संजना पाटील काय म्हणाल्या?
“मी राजकारणात यायचं ठरवलं नव्हतं. उमेदवारी समोरुन आली. भरपूर उमेदवार होते. पण मुक्ताईनगरच्या भरपूर लोकांची इच्छा होती की, संजना ताई उमेदवार असल्या पाहिजेत म्हणून मी नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला आणि आज शिंदे गटाची अधिकृत उमेदवार आहे”, असं संजना पाटील म्हणाल्या.

“खडसेंचं खूप काही होतं. पण ते २०१९  ला संपून गेलं”, असा खोचक टोला संजना पाटील यांनी लगावला. “आता जे आहे ते आम्ही करतो आहोत. समोरच्यांनी आम्हाला कितीही आव्हान दिलं तरी आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलू”, असं संजना पाटील म्हणाल्या. “नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर मुक्ताईनगरचा विकास करणं हेच आमचं उद्दीष्ट्य आहे. आम्ही वर्षभरातच मुक्ताईनगरचा कायापालट करुन दाखवू”, असंही संजना पाटील म्हणाल्या.

यावेळी संजना पाटील यांनी रक्षा खडसे यांच्याकडून महिला सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी त्यावर भूमिका मांडली. “मुक्ताईनगरमध्ये मला नाही वाटत की, महिला सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षित नसत्या तर मुक्ताईनगरमध्ये मनमोकळेपणाने वावरल्याच नसत्या. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर आम्ही जास्त बोलतो. मुक्ताईनगरमध्ये उत्तम शिक्षण असावं, असं वाटतं. त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करु”, अशी प्रतिक्रिया संजना पाटील यांनी दिली.

“त्यांचा घराणेशाहीचा आरोप हा कायमचा आहे. आताचा नाहीय. पण आम्ही घराणेशाही करत नाही आहोत. लोकांच्या प्रश्नांवर आणि लोकांच्या आशेला वास्तव्यात साकार करण्यासाठी आम्ही आज निवडणूक लढवत आहोत. विकासकामांच्या मुद्द्यावर निवडून येऊ”, असं संजना पाटील यावेळी म्हणाल्या.

Leave a Comment

अधिक वाचा