खेळ : आयपीएल २०२६ स्पर्धेतील १२वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. हा सामना पार पडला असं म्हणता येणार नाही. कारण पावसामुळे हा सामना रद्द करण्याची वेळ आली. यानंतर श्रेयस अय्यरच्या बहिणीने शाहरूख खानच्या संघाला ट्रोल केलं.
आयपीएल स्पर्धेतील १२ व्या सामन्यावर पावसाचं विरजन पडलं. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. ठरलेल्या वेळापत्रकानुसार, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होणार होता. पण हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. नाणेफेकीचा कौल कोलकाता नाईट रायडर्सने जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण पहिल्या चार षटकातच कोलकात्याचा संघ बॅकफूटवर गेला. दोन महत्त्वाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने दबाव वाढला होता. पण चार षटकात २५ धावांचा खेळ झाला आणि वरूणराजा मदतीला आला. पावसामुळे हा खेळ पुढे सरकू शकला नाही. त्यामुळे हा सामना रद्द करत दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला गेला. यानंतर श्रेयस अय्यरच्या बहिणीची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. यात ती केकेआर संघाची खिल्ली उडवताना दिसत आहे.
सलग दुसऱ्या पर्वात सामना रद्द
आयपीएल स्पर्धेतील सलग दुसऱ्या पर्वात केकेआर आणि पंजाब किंग्स सामना पावसामुळे रद्द झाला आहे. मागच्या पर्वात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. २६ एप्रिल २०२५ रोजी हा सामना होणार होता. पण नेमका पाऊस आला सामना रद्द करावा लागला. तेव्हा पंजाब किंग्सने २०१ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी केकेआरचा संघ उतरला तेव्हा ७ धावा झाल्या आणि पाऊस सुरू झाला. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला होता. आताही तसंच काहीसं झालं. पण यावेळी केकेआरची प्रथम फलंदाजी होती आणि पावरप्लेच्या चार षटकात दोन महत्त्वाच्या विकेट गमावल्या होत्या. पण पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला.
श्रेयस अय्यरच्या बहिणीने उडवली खिल्ली!
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरने केकेआरला मिळालेल्या एका गुणाची खिल्ली उडवली आहे. तिने शाहरूख खानच्या संघावर निशाणा साधत एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओत तिने केकेआर संघावर मिश्किल भाष्य करत सांगितलं की, पंजाबी लोकांचं मन मोठं असतं आणि एक गुण देऊन टाकला. दरम्यान, हा सामना रद्द झाल्याने पंजाब किंग्सच्या खात्यात ३ सामन्यानंतर ५ गुण, तर केकेआरच्या खात्यात ३ सामन्यानंतर १ गुण आला आहे. २०२४ या पर्वात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआरने जेतेपद मिळवलं होतं.





