नागपूर : राजकारणात काहीच स्थिर नसते. आज सत्ता आली म्हणून माज दाखवू नका असा मोठा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. त्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. राजकारणात पिढी बदले आणि त्यासोबतच नेतृत्वाही बदल होत. मात्र नेतृत्वाच्या पोटातून नवीन नेतृत्व समोर येता कामा नये. कार्यकर्त्यांतून नेतृत्व घडायला हवे. सत्ता मिळाली अथवा खुर्ची आली म्हणून माज दाखवू नका. माज येऊ देऊ नका. कारण जो खुर्चीवर बसला आहे तो उठणारच आहे. जर नाही उठला तर देव त्याला घेऊन जाईलच, अशा कोपरखळी मारत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. नागपूरमध्ये भाजपचा ४६ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमात गडकरी यांनी या कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली.
संधी द्यायला नाही, समाज बदलायला आलोय
कार्यकर्त्यांच्या कष्टावरच भारतीय जनता पक्षाने मोठी प्रगती केली. कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा कणा आहे. आपल्याकडे काही लोकांना दिवसरात्र केवळ निवडणुकाच दिसतात. माझे काय होणार याच विचारात ते असतात. मला एक संधी हवी असा त्यांचा टाहो असतो. मात्र आम्ही काही त्यांना संधी द्यायला आलेलो नाही. समाज बदलायला आलो आहोत, हे कार्यकर्त्यांनी कायम लक्षात ठेवावे असा इशारा गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिली. संधीसाधू राजकारणावर त्यांनी या कार्यक्रमातून निशाणा साधला.
तेरा क्या होगा कालिया?
आमच्या पक्षात जेव्हाही विषय चर्चिला जातो तेव्हा आम्ही आमचा किंवा आमच्या जातीचा कल्याण हो असं कधीच म्हणत नाही तर आम्ही विश्वाचं कल्याण व्हावं असं म्हणत असतो. शिवाजी महाराजांच्या इतिहासात कधी मशीद तोडली असे ऐकले नाही. त्यांनी सर्व धर्मांना सन्मान दिला. महिलांचा सन्मान दिला. नागपूरच्या ताजबागमध्ये गुन्हेगाराचा राज्य होतं. रात्रीला मुस्लिम बहिणी रस्त्यावर फिरू शकत नव्हती. तेव्हा पोलिसांना ठोकून काढायला सांगितलं. आमच्या येथे काही नेत्यांना दिवसरात्र निवडणुकच दिसते, माझं काय होईलं. तेरा क्या होगा कालिया या प्रमाणे त्यांचा सवाल असतो, असा चिमटा त्यांनी काढला.आमच्या काळात दत्ता मेघे साहेब हे युवक अध्यक्ष होते अशी आठवण गडकरी यांनी काढली.





