महाराष्ट्र – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी मुलींनी पुन्हा बाजी मारली असून, मुलांपेक्षा त्यांचा निकाल अधिक लागला आहे. तर राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. विद्यार्थी आपला निकाल दुपारी 1 वाजल्यापासून mahahsscboard.in आणि अन्य अधिकृत वेबसाईटवर तपासू शकतात.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी ते मार्च २०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला. थोड्याच वेळापूर्वी बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन सविस्तर निकाल सादर केला. यंदा १२ वीचा निकाल एकूण ८९.७९ टक्के लागला आहे. यंदाच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली तर सर्वाधिक कमी निकाला हा लातूर विभागाचा लागला आहे. नऊ विभागांमध्ये कोकण हा पहिल्या स्थानी असून या विभागाचा निकाल ९४.१४ % इतका लागला आहे.
गेल्या वर्षी, म्हणजे २०२५ साली १२ वीचा निकाल ९१.८८ टक्के लागला होता. यंदा (२०२६ साली) गेल्या वर्षीपेक्षा २.०९ टक्के कमी निकाल लागला आहे.
यंदाही मुलींची बाजी
१२ वीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर ८६.८० टक्के मुलं उत्तीर्ण झाली.
आज दुपारी १ वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच डिजीलॉकरवर (DigiLocker) देखील हा निकाल जाहीर करण्यात येणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे.
विभागनिहाय निकाल खालीलप्रमाणे
कोकण ९४.१४%
कोल्हापूर ८९.९७ %
मुंबई ९०.०८ %
छत्रपती संभाजीनगर ८८.६८%
अमरावती ९०.९२%
पुणे ९१.२५ %
नाशिक ९०.७२ %
नागपूर ८८.६७%
लातूर ८४.१४%
लाखो विद्यार्थ्यांचा लागला निकाल
फेब्रुवारी आणि मार्च २०२६ दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत, १२ वी आणि १०वीची परीक्षा घेण्यात आली होती. यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून १४ लाख ३३ हजार ०५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. दुपारी १ वाजता वेबसाईटवर निकाल चेक करता येणार आहे.
खालील दिलेल्या वेबसाईट्सवर विद्यार्थी त्यांचा निकाल चेक करू शकतील
mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
mahahsscboard.in






