पालघर – जिल्ह्यात महिला अधिकार्याला 45 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. पालघरमध्ये ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडली आहे.पालघरमधील कारवाईसंदर्भात एसीबीने ही माहिती दिली आहे. राज्यात गेल्या काही महिन्यात एसीबीने अनेक ठिकाणी कडक कारवाई केली आहे. राज्यात शिपायापासून ते तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या सनदी अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने अटक केलेली आहे.
त्यामुळे, एसीबीच्या कारवाईचा धाक प्रशासनातील अधिकाऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे अद्यापही लाचखोर कर्मचारी, अधिकारी एसीबीच्या कारवाईत सापडत आहेत. आता, पालघर एसीबी विभागाने पेल्हार ग्रामपंचायतीच्या ग्राम महसूल अधिकारी उज्वला प्रवीण पाटील यांना 45 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली आहे. या कारवाईमुळे पेल्हार परिसरात खळबळ उडाली आहे. पालघरमधील कारवाईसंदर्भात एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने बिलालपाडा येथील सर्व्हे क्रमांक 13/03 वरील जमिनीवर माती भरणी केली होती.
तसेच रूम बांधकामासंदर्भातील पंचनामा न करण्यासाठी आणि संबंधित प्रकरणात सहकार्य करण्याच्या बदल्यात उज्वला पाटील यांनी एकूण 1 लाख 95 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 1 लाख 50 हजार रुपये माती भरणीच्या पंचनाम्यासाठी, तर 45 हजार रुपये लाच रुम बांधकामाचा पंचनामा टाळण्यासाठी मागण्यात आल्याचे एसीबीच्या तपासात समोर आले झाले. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून 45 हजार रूपये स्वीकारताना उज्वला पाटील यांना पकडले आहे.
या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालघरमध्ये लाचप्रकरणात ही मोठी कारवाई केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील महिला अधिकार्याला अटक करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तर या एसीबीच्या कडक कारवाईने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही जबर धक्का बसला आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.






