महामार्ग नको, शेती वाचवा! जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचे आंदोलन; महिलांचा मोठा सहभाग

SHARE:

कोल्हापूर – शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्यांचे आंदोलन करण्यात आले. मोर्चासाठी ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. कोल्हापूरमध्ये शेतकरी बांधवांनी मोठे आंदोलन केले आहे. राज्यात शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. कोल्हापूरात आंदोलनासाठी हजारो शेतकरी आले होते. शेतकरी नेते राजू शेट्टी, राजकीय नेते सतेज पाटील, शाहू महाराज यांनीही शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्यांच्या मोर्चात सहभागी होऊन समर्थन दिले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी बांधव विरोध करत आहेत. शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करण्यासाठी कोल्हापूरमध्ये मोठे आंदोलन केले आहे. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी या मोर्चामध्ये ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आम्हाला आत्महत्या करायला लागली तरी चालेल, आमचे रक्त सांडले तरी चालेल, मात्र आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकरी आंदोलनातील महिलांनी घेतली आहे.
या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी बांधव एकत्र जमले होते. आमच्या जमिनी विकल्यानंतर आमच्या पोरा-बाळांची लग्न कशी होणार, असा प्रश्न देखील या आंदोलनात ग्रामीण भागातील शेतकरी महिलांनी उपस्थित केला आहे. राज्यात शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असे म्हणत कोल्हापूरमध्ये शेतकरी बांधव व शेतकरी महिलांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. राज्य सरकारच्या विरोधी घोषणा दिल्या आहेत.

या संदर्भात बोलताना राजकीय नेते सतेज पाटील यांनी म्हटले की, आंदोलक आणि शेतकऱी बांधवांना नको असलेला शक्तिपीठ राज्य सरकारने महामार्ग करु नये. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही. शक्तीपीठ महामार्गाला समांतर असा नागपूर-रत्नागिरी मार्ग सुरू आहे. मग असे असताना नव्या महा मार्गाची गरज काय? सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अनेक अल्पभूधारक शेतकरी आहेत. हे सगळे शेतकरी बांधव शक्तीपीठ महामार्ग झाल्यास भूमिहीन होतील.

कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा आणि महापूराचा तडाखा बसतो. शक्तीपीठ महामार्ग झाल्यास या महामार्गामुळे अनेक हेक्टर शेती उद्धवस्त होईल. या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक गावांमधील शेतकरी बांधवांची शेतजमीन महामार्गात जाणार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांबरोबर पर्यावरणाचे ही नुकसान होणार आहे. सध्या शेतकरी बांधवांच्या जमिनी या त्यांच्या जगण्याचे एकमेव साधन आहे. जमिनी यापूर्वीच गुंठ्यावर आल्या आहेत. आता जमिनी संपादित केल्यास शेतकरी अल्पभूधारक अथवा भूमीहीन होऊ शकतो, त्यामुळे कोल्हापूरमधील शेतकरी बांधवांचा शक्तीपीठ महामार्ग होण्यासाठी विरोध आहे, असे राजकीय नेते सतेज पाटील म्हणाले आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.

Leave a Comment