अमरावती : कृषी विभागाने खरीप हंगाम 2026 साठी राज्यस्तरीय पीकस्पर्धेचे आयोजन केले आहे. यात मूग आणि उडीदसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै असून, इतर पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे.
पिक स्पर्धेच्या माध्यमातून प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन राज्याच्या कृषी उत्पादकतेत वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या 11 प्रमुख पिकांचा समावेश आहे.
स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटाला प्रति पीक 300 रुपये तर आदिवासी गटाला 150 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाईल. शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आणि ती तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. भात पिकासाठी किमान 20 गुंठे आणि इतर पिकांसाठी 40 गुंठे क्षेत्रावर सलग लागवड असणे बंधनकारक आहे.
ही स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित केली जाईल आणि विजेत्यांना राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर पहिले, दुसरे आणि तिसरे रोख बक्षिसे दिली जातील. तालुका पातळीवर 5 हजार रुपये, जिल्हा पातळीवर 10 हजार रुपये, तर राज्य पातळीवर 50 हजार रुपयांचे पहिले बक्षीस मिळेल.
इच्छुक शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, शुल्क भरल्याचे चलन, सातबारा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, पिकाच्या क्षेत्राचा नकाशा आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत या कागदपत्रासह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पीक स्पर्धा नोंदणी येथे अर्ज करावा किंवा स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती.)
Author: आकाश रमेशराव दानखडे
लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.






