मुंबई – आगामी १२ मे रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या जागावाटपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात घमासान माजले आहे. काही दिवासांपूर्वी पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून नीलम गोऱ्हे प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली होती. परंतू आता या दोन्ही नावाला शिंदे यांच्या पक्षातूनच विरोध सुरू झाला आहे. नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नका, अशी मागणी शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीनं केली असून याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलं आहे.
शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात आरोप करण्यात आला आहे कि नीलम गोऱ्हे यांनी पक्ष संघटनेसाठी काहीही काम केले नाही. गोऱ्हे यांनी महिला कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले आणि चारित्र्यहनन तसेच आपापसात भांडणे लावून संघटनेचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गोऱ्हे यांच्याऐवजी एखाद्या निष्ठावान, सामान्य शिवसैनिकाला किंवा नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा उद्धव ठाकरेंप्रमाणे तुमचीही फसवणूक होईल, असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात तारीख व कुणाचे नाव नाही. त्यावर फक्त पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी असं म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे २०२६ रोजी मतदान प्रक्रिया संपन्न होईल. निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत शिंदेसेनेचे ५७ आमदार आहेत. आमदाराच्या संख्यामुळे शिवसेनेला दोन जागा मिळू शकतात. विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि माजी आमदार बच्चू कडू यांचे नाव अंतिम समजले जात आहे. मात्र याच दोन नावाला आता शिंदेसेनेतून विरोध होत आहे.






