विधानपरिषद निवडणूक बिनविरोध! पाहा १० नवनिर्वाचित आमदारांची संपूर्ण यादी आणि पक्षीय बलाबल

SHARE:

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत असून विधानपरिषदेच्या १० जागांसाठी होणारी निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने अकरावा उमेदवार रिंगणात न उतरवल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १२ मे रोजी मतदान आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होतील. जरी तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले, तरी त्यांना आवश्यक असलेल्या १० आमदारांच्या सूचक स्वाक्षऱ्या नसल्याने त्यांचे अर्ज तांत्रिक छाननीमध्ये बाद ठरवले जातील.

 

भाजपचे उमेदवार –

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ६ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. भाजपच्या वतीने सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

 

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार –

शिवसेना शिंदे गटाने डॉ. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना संधी दिली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार –

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी यांना संधी देण्यात आली आहे.

 

महाविकास आघाडीचे उमेदवार –

महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

 

२८ मतांचा कोटा आवश्यक –

संख्याबळाचा विचार करता विधानपरिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक असून, महायुतीकडे असलेले एकूण संख्याबळ पाहता त्यांचे ८ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, तर महाविकास आघाडीचे ४६ आमदार असल्याने त्यांच्या वाट्याला एक जागा आली आहे.

 

या आमदारांचा संपणार कार्यकाळ –

या निवडणुकीच्या निमित्ताने विधानपरिषदेतील अनेक दिग्गजांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, डॉ. नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे.

 

३० एप्रिल हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, त्यानंतर आता ४ मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. १२ मे रोजी अधिकृतपणे निकालाची घोषणा केली जाईल आणि १३ मे पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. या बिनविरोध निवडीमुळे राजकीय संघर्ष टळला असला तरी महायुतीचे सभागृहातील पारडे अधिक जड झाले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा