भारत विरुद्ध पाकिस्तान, एसएएफएफ U20 चॅम्पियनशिप २०२६ : क्रिकेट चाहत्यांना आयसीसी टी२०i वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेनंतर आयपीएल स्पर्धेतील १९ व्या मोसमाचे वेध लागले आहेत. या १९ व्या पर्वाचा २८ मार्चपासून श्रीगणेशा होत आहे. तर दुसऱ्या बाजूला फुटबॉल चाहत्यांना २६ मार्चची उत्सूकता लागून राहिली आहे. गुरुवारी २६ मार्चला २ कट्टर आणि चीरप्रतिद्वंदी आमनेसामने असणार आहेत. एसएएफएफ U-२० चॅम्पियन २०२६ स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान भिडणार आहेत. भारताचा हा या मोहिमेतील पहिलाच सामना असणार आहे. तर पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरो असा आहे.
टीम इंडिया-पाकिस्तान सामना
एसएएफएफ U२० मधील हा सामना साखळी फेरीतील चित्र स्पष्ट करणारा ठरु शकतो.माले इथील नॅशनल स्टेडियममध्ये हा सामना आयोजित करण्याता आला आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून स्पर्धेत विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडियाने त्यासाठी जोरदार सराव केला आहे. टीम इंडिया हा सामना जिंकण्यासाठी सज्ज आहे.तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसाठी एकाप्रकारे हा सामना ‘करो या मरो’ अशा पद्धतीचा आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा सामना प्रतिष्ठेचा झाला आहे.
टीम इंडिया कोणत्या ग्रुपमध्ये?
टीम इंडियाला या स्पर्धेसाठी बी ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. एका ग्रुपमध्ये एकूण ३ संघांना ठेवण्यात आलं आहे. त्यानुसार बी ग्रुपमध्ये भारताचे शेजारी देश आहेत. बी ग्रुपमध्ये टीम इंडियासोबत, बांग्लादेश आणि पाकिस्तानचा समावेश आहे. त्यामुळे एक सामन्यात विजय मिळवला तरी सेमी फायनल फेरी जवळपास निश्चित आहे.
टीम इंडियासमोर दुसऱ्या सामन्यात कुणाचं आव्हान?
टीम इंडियासमोर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचं आव्हान असणार आहे. हा सामना २८ मार्चला नियोजित आहे. टीम इंडिया या सामन्यात बांग्लादेश विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
“प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा”
“टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हा सामना फार मोठा असतो. मात्र आमच्यासाठी हा सामना इतर सामन्यांप्रमाणेच आहे. प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आमचा स्पर्धेत चांगली आणि सकारात्मक सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. तसेच आम्हाला सतर्क राहून संयमाने आणि शिस्तीत खेळावं लागेल”,असं अंडर २० फुटबॉल टीम इंडियाचे हेड कोच महेश गवळी म्हणाले.





